एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
जीवनाशी पैज घ्याया लागला, श्वास आता अडखळाया लागला ॥
वाढला निवडुंग जेव्हा भोवती, मोगरा तेव्हा फुलाया लागला ॥
कोणती होती दिशा ती वेगळी, सूर्य जेथे ढासळाया लागला ॥
चालता वाटेवरी काट्यातुनी, कोण पंचम आळवाया लागला ॥
तो दिसे मुक्काम डोळ्यांच्या पुढे, प्राण अन् येथे ढळाया लागला ॥
काय सैताना तुझा हा न्याय रे, पुत्र आईला विकाया लागला ॥
ज्या कुणा वैरीच होते मानले, आज मज तो आवडाया लागला ॥
शाल प्रेमाची कुणी वेडा खुळा, कंचनीवर पांघराया लागला ॥
निवडूनी येऊन सत्तेवर पुन्हा, मर्कटी लीला कराया लागला ॥
लावलासी चन्दनाचा लेप तू, जीव परि अजुनी जळाया लागला ॥
करबल्याच्या धूळभरल्या संगरी, हसन कोणी तडफडाया लागला ॥
आसवे वा घर्मबिंदू काय की, पदर वदनावर भिजाया लागला ॥
जमवुनी नाणी हजारो ठेवली, अन् खिसा तो खुळखुळाया लागला ॥
झोपडीमाजी सुखाने राहुनी, शहर सारे जागवाया लागला ॥
बन्द सारे कारखाने येथले, धूर मग कोठे निघाया लागला ॥
वाचली कवने सुरावर जेधवा, प्रत्येकजण पाया पडाया लागला ॥
भेट शेवटची शशी’ ही आपुली, भैरवीचा स्वर घुमाया लागला ॥
शशीकला.