एकली
धारांच्या तालावर नाचणाऱ्या मोराला सांगितलं कितीदा नको रे नाचू... प्रत्येक पाऊल तुझं गवतावर पडणारं जिवावर पडतं अन् लागतं बोचू ...
चार भिंती या जगाच्या सोबती, आसरा कोणास आता मागती ।
संपले तेव्हाच मी जेव्हा कधी, मित्र आले दुश्मनांच्या संगती ॥
टाकली तोडून आता पैंजणे, नादवलये ही कशाला भोवती ।
मी प्रकाशा या घरी बोलाविले आणि खिडक्या बंद साऱ्या तापती ॥
नाव सांगुन फूलपंखी कोण ते, रोज सुमनांच्या सुगंधा चोरती।
रोप ज्यांनी एकही ना लाविले, हक्क ते साऱ्या फुलांवर सांगती ॥
गाव जरि हा वेढलेला त्या ढगांनी , या जमीनी ताहनेल्या राहती।
या उभ्या जखमा समोरी स्वागता, ती सुखे लांबून मजला बाहती॥
त्या कमानीतून जे ना मारले, लक्षवेधी बाण ते मज विंधिती ।
काल जे यादीत होते मृत्यूच्या, आज ते सुखरूप कैसे राहती ॥
दुःख हे हृदयात घेऊन चालता, ओठ तुझिया कारणे हे हासती ।
साजरा सत्कार केला कालचा, देऊनी हातात जळती ज्योत ती ॥
पूर्ण झाला पांडवांचा सूड तरीही, कोण फिरतो जखम घेऊन वाहती ।
काल ज्यांना मी भुकेले पाहिले, आज ते भिक्षा दुजांना घालती ॥
कस्तुरीचा गंध येतो कोठुनी, ना कळे मृग चौ दिशांना धावती ।
थांबूनी रस्त्यात तुझिया कैकदा, पाहिली अमुचीच आम्ही वाट ती ॥
शाकिकला